ads

Breaking News

प्रसिद्ध विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचं निधन

मुंबईः प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि पुष्पा भावे यांचे वयाच्या ८१व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. रात्री १२.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी ८ वाजता शिवाजीपार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाबाईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला. साहित्यात नाटक हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्या क्षेत्रात त्यांचा प्रत्येक शब्द वजनदार मानला जातो. डॉ. श्रीराम लागू यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुष्पाबाईंच्या संपादनाखाली निघालेला 'आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू' हा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो. निडरपणा म्हणजे काय, याचे उदाहरण म्हणून पुष्पाबाईंकडे पाहता येते. मुंबईतला मराठी माणूस कमी होत असल्याची चर्चा आजही होते. परंतु त्याविरोधात पंचवीस वर्षांपूर्वी आवाज उठवत होत्या आणि मराठी माणसांना मुंबईबाहेर घालवण्यास मराठी माणसांचे कैवारी म्हणवून घेणारेच जबाबदार असल्याचे सांगत होत्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iu1uPc

No comments