'महाराष्ट्रानं अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली, आज राज्य संकटात असताना...'
मुंबई: 'महाराष्ट्रानं सदैव देशातील लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. आजही करत आहे, पण आज संकटात असताना केंद्रातले मंत्री दिल्या-घेतल्याच्या हिशेबाच्या चोपड्या फडकवून महाराष्ट्राला त्रास देत आहेत. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं भाजप व केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. ( Criticises BJP for Remdesivir and ) राज्यात दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्र सरकारनं कंपन्यांना धमक्या देऊन महाराष्ट्र सरकारचा औषध पुरवठा रोखल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. तर, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा केल्याचा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून गोयल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, राज्यातील भाजपवरही तोफ डागली आहे. वाचा: 'महाराष्ट्राला सर्वाधिक प्राणवायू देऊन केंद्रातले सरकार मोठी मेहेरबानी करत नाही. मुंबईसह महाराष्ट्र केंद्र सरकारच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा ‘खणाखणा’ ओतत आहे. हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील,' असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. 'विरोधी पक्षाचा ‘अजेंडा’ सोपा आहे. महाराष्ट्राचे सरकार करोनाशी लढण्यास अपयशी ठरावे यासाठी केंद्राच्या मदतीने त्यांचे विशेष प्रयत्न अखंड सुरूच आहेत. सरकारला प्राणवायूचा, रेमडेसिवीरचा पुरवठा करता येत नाही, पण ‘भाजप’ विरोधी पक्षांत असूनही लोकांना प्राणवायू व रेमडेसिवीर देऊ शकते, हा काय प्रकार आहे,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे. वाचा: 'महाराष्ट्र सरकारला रेमडेसिविरचं इंजेक्शन हवं, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करून देतात हा अपराधच आहे, पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागले. भाजपनं हा रेमडेसिविरचा साठा म्हणे विकत घेतला. मग हा साठा सरकारला का मिळू नये? विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावं? विरोधी पक्षनेते महाराष्ट्राची वकिली करण्याचं सोडून महाराष्ट्राला औषधे नाकारणाऱ्या फार्मा कंपनीची वकिली करीत आहेत. हे असे कधी महाराष्ट्रात पूर्वी घडले नव्हते,' अशी खंतही शिवसेनेनं व्यक्त केली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32nyVNY
No comments