आधी चक्कर आली, मग मृत्यूने गाठले; ९ जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू
नाशिकः अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने शहरातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात हे मृत्यू झाल्यानं शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात चक्कर येऊन ४ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे हे मृत्यूही एकाच दिवसात झाले होते. त्यामुळं गेल्या तीन दिवसांत हा आकडा १३ वर पोहोचला आहे. त्यात तरुणाचाही सर्वाधिक समावेश आहे. यातील काही जणांना रस्त्याने पायी जात असताना अचानक चक्कर आली तर, काही जणं राहत्या घरी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडले आहेत. वाढत्या तापमानामुळं अडचणी वाढल्या गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील तापमानाचा पारा वाढला आहे. शहरातील तापमान सध्या ४० अंश सेल्सियस आहे. ज्यामुळं लोकांना उष्माचा त्रास होऊ लागला आहे. याच कारणामुळं मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळं चक्कर येऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये. डॉक्टरांनी व्यक्त केलं आश्चर्य चक्कर येऊन मृत्यू झाल्याच्या घटनांमुळं डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केली आहे. चक्कर येणं व बेशुद्ध पडणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. अशी काही लक्षणं आढळल्यास लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क साधा, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. तसंच, लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणं टाळा तसंच, जर घराबाहेर पडायचं असल्यास सावधगिरी बाळगा, असंही त्यांनी म्हटलं आहे. शनिवारी नाशिकमध्ये चक्कर आल्यानं ४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ga68Vc
No comments