करोना संकटात दिलासा; 'रिलायन्स' देणार दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना बोनस
मुंबई : देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. २०२०-२१ या करोनाच्या संकट वर्षात कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस आणि व्हेरिएबल पेची घोषणा केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीला ५३७३९ कोटींचा नफा मिळाला आहे. इंधन, रसायनापासून ग्राहकोपयोगी सेवा क्षेत्रात विस्तार असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पाच विभागांमधील कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे अदा करण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२०-२१ या वर्षात कन्झुमर बिझनेसमध्ये ७५००० कर्मचाऱ्यांना जोडले आहे. देशातील एका कंपनीकडून केलेली सर्वात मोठी कर्मचारी भरती आहे. करोना संकटापासून ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींमध्ये मोठे बदल झाले आहेत. ऑनलाईन शॉपिंग हा अविभाज्य घटक बनला आहे. त्याचा फायदा घेत रिलायन्स इंडस्ट्रीजने कन्झुमर बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी ५ टक्के अधिक तरतूद केली. कंपनीने यासाठी १४८१७ कोटी खर्च केले. एकीकडे रिलायन्सला कन्झुमर बिझनेसने तारले असले तरी दुसऱ्या बाजूला कंपनीचा मुख्य व्यवसाय असलेल्या इंधन आणि रसायने या व्यवसायाला करोना संकटाचा फटका बसला आहे. परिणामी या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १० टक्के वेतन कपात सहन करावी लागली होती. इंधन मागणीत झालेलीही मोठी घट आणि या विभागाची सुमार कामगिरी यामुळे कंपनीने या विभागातील कर्मचाऱ्यांचा बोनस स्थगित केला होता. सहा महिन्यानंतर कंपनीने वेतन कपात मागे घेतली होती आणि कर्मचाऱ्यांना बोनस देखील दिला होता. गेल्या वर्षी कंपनीची इंधन आणि रसायने उद्योगाची उलाढाल २९ टक्क्यांनी कमी होऊन ३८१७० कोटी झाली आहे.
from व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times https://ift.tt/3b1ODTv
No comments