करोनामुळं पालक गमावलेल्या बालकांची विक्री; सरकारने उचलले कठोर पाऊल
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः करोनाच्या आजारात आईबाप गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदा दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाज माध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना समाजासाठी घातक आणि गंभीर गुन्ह्याच्या असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने मंगळवारी दिला आहे. करोनामुळे दोन्ही पालकांच्या मृत्यू मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर करत असल्याचे चित्र समाज माध्यमांवरील पोस्टवरून दिसून येत आहे. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे- देणे वा खरेदी-विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अनाथ बालकांना संकट काळात मदत मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि 'सेव्ह द चिल्ड्रेन' (इंडिया)च्या संयुक्त विद्यमाने विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे, ८३०८९९२२२ आणि ७४०००१५५१८वर सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत संपर्क साधावा. करोना वा इतर कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल, अशा बालकास कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ekofXi
No comments