काँटे की टक्कर... नंदीग्राममध्ये अखेर ममता बॅनर्जींचा विजय!
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. परंतु, मतमोजणीत मात्र तृणमूल काँग्रेसनंच बाजी मारलेली दिसतेय. तर नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री - तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आणि ममतांचे एकेकाळचे सहकारी - भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. अखेर ममता बॅनर्जी यांनी सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केलाय. नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक इतकी चुरशीची ठरली की मतमोजणीच्या १६ व्या फेरीअखेरीस तृणमूल उमेदवार ममता बॅनर्जी आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात केवळ ६ मतांचा फरक उरला होता. पश्चिम बंगालच्या रणसंग्रामात तृणमूल काँग्रेसनं २०० हून अधिक मतदारसंघांवर ताबा मिळवलाय. तर भाजपला मात्र १०० जागांच्या टार्गेटपर्यंत पोहचणंही कठीण होऊन बसलेलं दिसतंय. सुरुवातीच्या कलानुसार, सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जींनाही भारी ठरले. परंतु, शेवटच्या फेरीच्या मतमोजणीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर मतमोजणी अखेरीस त्या आघाडीवर राहिल्या आणि केवळ १२०० मतांच्या त्यांनी सुवेंदू अधिकारींना मागे टाकलं. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील मोठमोठ्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सपा नेते अखिलेश यादव, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्यासहीत अनेक नेत्यांनी दीदींना विजयाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nCTzn4
No comments