ads

Breaking News

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं; मराठी दिग्दर्शकानं दिली 'अशी' प्रतिक्रिया

मुंबईः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं त्यांनी हे गाणं गायलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून गाण्याला नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींनी अमृता यांच्या या गाण्याला दाद दिली आहे तर, काहींनी गाण्यावर सडकून टीका केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता यांनीही एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या गाण्यावर टीका केली आहे. महेश टीळेकर यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहली आहे. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. 'गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे ” आडात नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून? केवळ ह्या अश्या गायिकेला प्रोमोट करण्यासाठी तिला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यासाठी टी सिरीज सारखी, नेहमीच बिझिनेसला प्राधान्य देणारी कंपनी का पैसा खर्च करत आहे,?त्यामागे काय लागेबांधे आहेत ? हे एक न सुटणारे कोडे आहे, असंही टिळेकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी, अमृता यांना एक सल्लाही दिला आहे. 'जर ह्या गायिकेकडे स्वतःचा अतिरिक्त खूपच पैसा असेल तर तिने एखादं संगीत विद्यालय सुरू करून नवोदित गायकांना चांगल्या संगीत शिक्षकांचे मार्गदर्शन होईल यासाठी स्वतः न गाता फक्त संगीत सेवा करावी, असंही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'पण काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ” आज अमृताचा घनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो.इतरांनी फक्त त्या अमृता नावाची किमान लाज राहील याचा तरी प्रयत्न करावा,' असंही टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट मध्ये लिहलं आहे. सध्या टिळेकर यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2IBTPTk

No comments