गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश
म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांची पोलिस प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच करोनाचे निर्बंध व नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री यांनी शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा वळसे पाटील यांनी घेतला. या बैठकीला अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) आनंद लिमये, प्रधान सचिव विनीत अग्रवाल, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. हे सर्व निर्बंध करोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य सरकार घेत आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 'आम्ही तुमच्यासोबत' करोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजावावे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी पोलिस यंत्रणेला दिला आहे. तसेच जनतेने करोनाच्या या लढाईमध्ये सरकार तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करून करोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम १४४च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी 'ब्रेक द चेन'च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ssHWzP
No comments