गोंदियात ऑक्सिजनअभावी १५ रुग्णांचा मृत्यू?
म. टा. वृत्तसेवा, वेळीच उपलब्ध न झाल्याने गोंदियाच्या सरकारी रुग्णालयांमधील सुमारे १५ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यासंदर्भातील मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. विदर्भात दिवसागणिक करोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्याही अधिक असतानाच दोन दिवसांपासून निर्माण झाला. गोंदियात गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक ऑक्सिजन संपणार असल्याचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच सुमारास काही रुग्ण दगावल्याचेही समोर आले. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने हे जीव गेल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी केला. प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात शुक्रवारी जिल्ह्यात नवे ५७८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ३९० बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात डीसीएचसी केटीएस रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील प्रत्येकी १२ याप्रमाणे २४ रुग्णांचा समावेश आहे. पाच रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दगावले आहेत. रुग्णांचा हा वाढीव आकडा ऑक्सिजनअभावामुळे असल्याचा आरोप होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३१० रुग्णांचा मृत्यू झाला असून याचा दर १.१ टक्के आहे. खासगीमधून अडचण सोडविली : डॉ. मोहबे 'गोंदियाच्या रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पण, वेळीच नॉन कोव्हिड खासगी रुग्णालयांमधून शक्य होणारा सर्व ऑक्सिजनचा साठा करोनाबाधित रुग्णांना उपलब्ध करण्यात आला. रात्री साडेबारा वाजता व नंतर पहाटे अशा दोन गाड्या भरून ऑक्सिजनचे सिलेंडर आले. अडचण मिटली,' अशी माहिती गोंदियाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी 'मटा'शी बोलताना दिली. सोशल मीडियावरील मेसेजेस तथ्यहीन असल्याचा दावाही त्यांनी केला. - डॉ. अविनाश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32keRf9
No comments