Rashmi shukla : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पुन्हा समन्स
मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी मुंबईला येण्यास वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांनी नकार दिल्याने सायबर पोलिसांनी त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे. ३ मे पर्यंत मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणात दाखल गुन्ह्यांत चौकशीसाठी मुंबईत चौकशीला येण्यास नकार दिला होता. चौकशीवेळी विचारण्यात येणारे प्रश्न आणि एफआयआरची प्रत पाठवण्याची मागणी करतानाच, त्यांनी चौकशीला येण्यास नकार दिला होता. त्यासाठी त्यांनी करोनाचे कारण दिले होते. त्यामुळे यापुढे काय पावले उचलतात, याकडे लक्ष लागले होते. सायबर पोलिसांनी आज पुन्हा शुक्ला यांना समन्स बजावले आहेत. ३ तारखेपर्यंत मुंबईत चौकशीला हजर राहावे, असे समन्समध्ये नमूद करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी, फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी राज्य गुप्तचर विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी सायबर पोलिसांनी समन्स पाठवले होते. मुंबईला त्यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी येण्यास सांगितले. मात्र, त्यावर त्यांनी लेखी उत्तर देत मुंबईत चौकशीला येण्यास नकार दिला होता. करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा वेळी येऊ शकत नाही, अशे त्यांनी कारण दिले होते. चौकशीवेळी विचारले जाणारे प्रश्न आणि एफआयआरची प्रत पाठवण्यात यावी, त्याचे उत्तर देते असेही त्यांनी लेखी उत्तरात नमूद केले होते. समन्स बजावूनही चौकशीला मुंबईत हजर न राहणाऱ्या शुक्ला यांना सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले आहेत. ३ तारखेपर्यंत मुंबईत येण्यास सांगितले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xAy8HA
No comments